मुंबई: “ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केलं. त्यानंतर लोणावळ्यात रविवारी ओबीसींची परिषद भरलीय. त्यातही सर्व पक्षाचे ओबीसीचे नेते एकत्र आलेले आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं. ह्या नेत्यांच्या भाषणातखरं मन जिंकलं ते वडेट्टीवारांनी. त्यांनी स्वत:च्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर मनातली खदखद बोलून दाखवली. सोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही साद घातली.
यावेळी काँग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला जोरदार टीका केली. मी जिथे राहतो तिथे मोठ्या प्रमाणात वाघ आहेत, असे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावर व्यासपीठावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा, असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावरूनच आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 28, 2021
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांची खदखद बाहेर पडली. राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद तरी मिळेल असं वाटलं होतं. पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खातं मिळालं. पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळालं असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणजेच आपण फक्त ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात असा दावाच वडेट्टीवारांनी केला.
मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहोत. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल, प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब… माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी झुकायला आणि वाकायला तयार आहे समाजासाठी. या बैठकीचा विचार ज्यावेळी पहिल्यांदा मांडला त्यादिवशी पासून मला रोज धमक्या येत आहेत. मला रोज १० धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. कोरोना लाट गेली, की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार. जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे. आमच्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले.