राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न शरद पवार विचारतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरात जाऊन कोरोना नष्ट कर, असे गाऱ्हाणे विठुरायासमोर का मांडले, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.
येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला त्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिप्रश्न करून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
पवार म्हणाले, “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”