मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज मुंबईत येत आहेत. दादरच्या योगी सभागृहात त्यांचं भाषण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात मुंबईत निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढ करून काँग्रेसने भाई जगताप यांनी हा मुद्दा हायजॅक करत आज मुंबईत प्रचंड ‘निषेध मोर्चा’ काढला आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावरून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली असून सकाळी सकाळीच या मोर्चाला हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने काँग्रेस मुंबईत कात टाकत असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसने सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच मोर्चाला सुरुवात केली. रविवार असतानाही एवढ्या सकाळी हजारो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. राज्याच्या मंत्री वर्षा गायकवाड, चरणजीत सप्रा, नसीम खान आणि सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या रॅलीला उपस्थित आहे.
दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानापासून निघालेल्या या रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित आहेत. या रॅलीत महिलांचा सहभाग सर्वाधिक आहे. सर्वांच्या हातात फलक असून त्यावर काँग्रेसच्या कार्यकाळात 2014मधील गॅस सिलिंडरचे भाव आणि आताचे गॅस सिलिंडरचे भाव लिहिण्यात आले आहेत. या फलकावर 2014मध्ये गॅस सिलिंडर 392 रुपयांना मिळत होता, आता त्याची किंमत 721 रुपये झाल्याचं लिहिलं आहे. ‘मोदी सरकार हायहाय’, ‘इंधन दरवाढीचा निषेध असो’, अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. काँग्रेसच्या या मोर्चामुळे दादरमध्ये वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. हे मोर्चेकरी सीतारामन यांचा ताफा अडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.