नवी दिल्ली : भारतात महामारीच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. देशभरात बाधितांची रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूदराचा आलेख देखील उंचावत आहे. परिणामी देशाची आरोग्ययंत्रणा महामारीला थांबवण्यासाठी अपुरी पडत असून, यामुळे देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
यातच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हा एकप्रकरचा उच्चांक असून, २४ तासांत ४ लाखांहून जास्त बाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे देशभरातून नागरिकांकडून, महामारीला थोपवण्यासाठी केल्या जात असलेल्या नियोजनावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी देखील वाढू लागली आहे. तसेच देशभरातील भाजपेतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांकडून, काय करतेय केंद्र सरकार, अशा प्रकारचा प्रातिनिधिक सवाल विचारला जात आहे.
दुसरीकडे, वाढत्या रुग्णसंख्येयमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला असून, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर यांच्या तुटवड्यामुळे देशात परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. दरम्यान, कालच्या या नकोश्या विक्रमामुळे, देशातल्या करोना बाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.