मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये २६ जुलैला त्यांनी तुकाराम मुंढेंना आपला ‘फुल सपोर्ट’ असल्याचं जाहीर केले होते. मात्र त्यानंतर एक महिन्यांनी ठाकरे सरकारने तुकाराम मुंढे यांची बदली केल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. राजकीय दबावामुळे उद्धव ठाकरेंनी हि बदली केली असल्याची चर्चा रंगू लागली आहे
‘तुकाराम मुंढे नागपुरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे? मी शिस्तीच्या मागे उभा आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय?’’… असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत केले होते . पण, या मुलाखतीनंतर बरोब्बर एका महिन्याने, म्हणजेच २६ ऑगस्टला ठाकरे सरकारनेच तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. राजकीय दबावापुढे उद्धव ठाकरे झुकले की तुकाराम मुंढेंचेच चुकले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आपल्या १५ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांच्या १४ बदल्या झाल्या आहेत. धडाकेबाज निर्णय घेणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहेच, पण राजकारण्यांसोबतचं त्यांचे हेकेखोर वागणंही नेहमीच चर्चेचा विषय ठरले . ते कुणालाच जुमानत नाही, स्वतःचंच घोडं पुढे दामटतात, हुकूमशाहीनं वागतात, अशी तक्रार ते जिथे-जिथे गेले तिथल्या नेतेमंडळींनी केली आहे . अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर हे प्रमाण अधिकच वाढलं. नेत्यांशी ‘पंगा’ घेतला की जनतेचा पाठिंबा, लोकप्रियता वाढते, हे ओळखून मुंढे असं वागतात का, असाही प्रश्न राजकीय-प्रशासकीय वर्तुळात विचारला जातो.