ठाकरे सरकारमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यात सर्वाधिक चर्चा नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची झाली. मुंढेंची आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंढेंची ही 16वी बदली आहे. काही महिन्यांपुर्वीच त्यांना नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
नागपूर महापालिकेते नगरसेवक, महापौरांशी देखील त्यांचे अनेक मुद्यांवरून मतभेद झाल्याचे समोर आले होते. आपल्या बदलीवरून बोलताना त्यांनी आता नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले, असे म्हटले आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना मुंढे म्हणाले की, माझ्या कितीही बदल्या झाल्या तरीही मी तत्वांशी तडजोड करणार नाही. भाजपविरोधक आहात का ? याप्रश्नावर ते म्हणाले की, मी कोणाच्याही विरोधासाठी वा बाजू घेण्यासाठी कामच करत नाही. शासकीय अधिकारी म्हणून नि:पक्षपणे काम करतो. शासनाचा अधिकारी म्हणून मी काम करतो याचा अर्थ मी कुण्या पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत नाही.
माझ्या चारित्र्यहननापर्यंतचे प्रकार घडले हे वेदनादायी आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदावरून माझी बदली व्हावी, असा मी काय गुन्हा केला होता, असा सवालही त्यांनी केला.
आता पुढे काय ? या प्रश्नावर ते म्हणाले की, कोठेही काम करताना कमीत कमी 2 वर्ष मिळावीत. समाजात असंख्य नागरी प्रश्न आहेत. माझे आईवडील शेतकरी. जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी चालत राहीन.