पंढरपूर: शासन उजनीच्या पाण्याबाबतीत लेखी आदेश काढत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरून आता सोलापूर जिल्ह्यातील आणि इंदापूर तालुक्यातील आंदोलने चिघळण्यास सुरुवात झालेली आहे. दिवसेंदिवस आंदोलने जोर धरत आहे. कधी बोंबाबोंब आंदोलन तर कधी लाटण घेऊन जाब विचारण्याचा प्रकार तर कधी टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत आहे. काल दुपारी उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-सातारा रोड येथे आंदोलन करण्यात आले आहे. या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी हा रास्ता अडवत या ठिकाणी टायर जाळून आंदोलन केलं आहे.त्यामुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
टायर जाळून आंदोलन केल्यामुळे तब्ब्ल दोन तास वाहतुकीला अडचण निर्माण झालेली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी देण्याच्या सर्वेक्षणाचे आदेश निघाले होते. सोलापुरातून मोठा विरोध झाल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हा आदेश रद्द केला आहे असे जाहीर देखल केले होते. मात्र जो पर्यंत लेखी आदेश निघत नाही तो पर्यंत आंदोलने थांबणार नाहीत असा पवित्रा सोलापूरकरांनी घेतला आहे. त्यानुसार उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खूपसे, माउली हळणवर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.
हे पण वाचा “अन्यथा जयंत पाटल्यांच्या निवास्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार” अतुल खुपसे
उजनी धरणातील पाण्यावरून सध्या सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संघर्ष वाढत चालला आहे. सोलापूर वासियांनी इंदापूर तालुक्याला देण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाण्याबद्दल मोठा विरोध केलेला आहे. सोलापूर मधील कॉग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे,आमदार शहाजी पाटील यांनी देखील इंदापूर ला पाणी देण्याच्या बाबतीत विरोध दर्शविला आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने मात्र आता आक्रमक पणे पुढे येत आंदोलनाचा पर्याय निवडला आहे आणि आपला विरोध दर्शविला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांच्या आक्रमकतेपणामुळेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. मात्र जयंत पाटील यांनी ते वक्तव्य केल्यानंतरही अजून देखील त्यासंदर्भातील लेखी आदेश प्राप्त झालेला आहे. सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली सोलापूरकरांना वेड्यात काढण्याचा पहिलेच प्रयत्न निरर्थक झालेला आहे असे खूपसे यांनी म्हटले आहे.