मुंबई : सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांच्या रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, रुग्णसंख्या ५५ ते ६० हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच काल झालेल्या टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत, राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यात ७ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यातच काल रात्री नालासोपारा येथे ऑक्सिजनच्या अभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. त्यावरून आता भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवरून, राज्य सरकारवर ट्विट करून टीका केली आहे.
या ट्विटमध्ये अतुल भातखळकर यांनी, ‘नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, नालासोपाऱ्यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १० रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्याबाबतीत वसई-विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रेसनोट जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.
नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात सात रुग्णांचा मृत्यू. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते. pic.twitter.com/F61P38FBXQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 13, 2021