मुंबई : राज्यातल्या वाढत्या करोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी, राज्यातील १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच नंतर त्यांनी यात ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांनाही अशाचप्रकारे पास करण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, राज्यातल्या या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडयांनीही एमपीएएससी आणि इतर परीक्षा रद्द करून, पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, तिला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, मात्र १० वी आणि १२ वीच्या परीक्षांबाबत अशा प्रकारचा काहीच निर्णय झालेला नसल्यामुळे, विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, “राज्यातल्या करोना परिस्थितीचा विचार करता, राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण होत आहे, तर शहर व ग्रामीण भागातही करोनाचे संक्रमण वाढले आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे, हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
“१० वी आणि १२ वीची परीक्षा, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. यंदाच्या वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु गेल्या २ महिन्यांमध्ये करोनाचे संक्रमण मोठ्या वेगाने वाढले आहे. सरकारी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात महामारीच्या विरुद्ध लढा देत आहेत. राज्यात एकीकडे सरकार कडक निर्बंध लावून करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही,” असं पटोले यांनी म्हटलं आहे.
तसेच त्यांनी, “१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, परीक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, परिक्षेसाठी लागणारा इतर कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक घटक एकमेकांच्या संपर्कात येतात. यामुळे अनेकांना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबात सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करावा,” अशी मागणी पटोले यांनी केली आहे.