मुंबई : देशात १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं देखील लसीकरण करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय केंद्र सरकारनं थोड्याच दिवसांपूर्वी घेतला.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर देशातल्या अनेक राज्य सरकारांनी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार देखील राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी यांनी उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मोफत लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना, “१८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.” असं सांगितलं. तसेच, राज्यात लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही यासाठी काही वेळ लागेल, परंतु नागरिकांनी कोवीन ऍपद्वारे नोंदणी करून घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले आहे.