मुंबई : महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या फैलावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि इतर औषधे, तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे.
यावरून तसेच लसीकरणावरून, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून आणि लसींच्या किंमतीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात देखील या कारणावरून धुसफूस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. महामारी काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र या काळात सर्वोतम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे होत असलेल्या चर्चेमध्ये महामारीच्या या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. त्यामुळे आता या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, काल राज्यात ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात ६१ हजार १८१ जणांनी महामारीवर मात केली आहे. तसेच राज्यात सध्या महामारीचे ६ लाख ७३ हजार ४८१ सक्रिय रुग्ण आहेत.