पुणे : मुंबई उच्च न्यायालायने मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी, कडक टाळेबंदी विचार करावा, अशी सूचना केली होती.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात महामारीची आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. या बैठकीला सर्व यंत्रणांचे पदाधिकारी आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. यावेळी बैठक पार पडल्यांनंतर त्यांनी कडक लाॅकडाऊनबाबत सुचक वक्तव्य केलं आहे.
पुण्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. तसेच, मागील महिनाभरापासून पुण्यात टाळेबंदी ही आहेच. या परिस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, या महामारीच्या विळख्यातून बरे झालेल्यांची संख्या देखील जास्त आहे. यापेक्षा अधिक कडक टाळेबंदी आणि त्याचे परिणाम काय असू शकतात, त्यामुळे सध्यातरी पुण्यात कडक टाळेबंदीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट मत मांडलं आहे.
यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडलेल्या आकडेवारीवर देखील शंका घेतली आहे. उच्च न्यायालयात सादर केलेली माहिती, आकडेवारी कधीची आहे? राज्य सरकारच्या आणि न्यायालयाच्या आकडेवारीत विसंगती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे महापालिका, न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करुन वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडणार आहेे,असं देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.