पुणे : करोना लसीच्या पुरवठ्यावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. काल राज्यात करोना प्रतीबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण होऊन, अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली.
यावरून सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी सुरु असून, केंद्र सरकारवर राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी नाराजीचा सूर आवळलेला आहे. दुसरीकडे केंद्राकडून देखील राज्य सरकारवर, या आरोपांची गंभीर दखल घेत आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, पुण्यात देखील करोना संक्रमणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली असून, आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, त्यातून निर्माण झालेली भयंकर परिस्थिती, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
यात त्यांनी राज्यात इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला आहे. तसेच, राज्यात करोना लसींचा देखील तुटवडा जाणवू लागल्याने, भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, केंद्र राज्याला सर्वतोपरी मदत करत असल्याचा पुनरुच्चार केला आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्याचे महापौर देखील उपस्थित होते.
यावेळी अजित पवारांनी, मलाही कळतंय की सहनशीलता संपत आली आहे. पण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. तरच करोनाची साखळी तोडता येईल. त्यामुळे एकमेकांवर टीका व राजकारण न करता प्रत्येकाने आपापले काम करावे. केंद्राने हे केलं नाही असं आम्ही म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं की आम्ही हे देतो, हे न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करणं गरजेचं आहे. असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, उद्या पुण्यातल्या विभागीय आयुक्त, पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्यासोबत, व्यापाऱ्यांचीही बैठक घेणार असून, त्यानंतर दुकानांबाबतची भूमिका घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.