पुणे : करोना लसीच्या पुरवठ्यावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. काल राज्यात करोना प्रतीबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण होऊन, अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. यावरून सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी सुरु असून, केंद्र सरकारवर राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी नाराजीचा सूर आवळलेला आहे. दुसरीकडे केंद्राकडून देखील राज्य सरकारवर, या आरोपांची गंभीर दखल घेत आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात करोना संक्रमणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात राज्यात इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला आहे. तसेच, राज्यात करोना लसींचा देखील तुटवडा जाणवू लागल्याने, भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, केंद्र राज्याला सर्वतोपरी मदत करत असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी ९५ लाख वापरले असून १५ लाख ६३ हजार व्हॅक्सिन्स शिल्लक आहेत. मात्र या शिल्लक लसींचे योग्य वाटप झाले पाहिजे. ही आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही, असे सांगत त्यांनी, आम्ही राजकारणाचे उत्तर जरुर वेगळं देऊ असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी जावडेकर हे देखील म्हणाले आहेत की, करोना परिस्थितीच्या उपाययोजनांचा विस्तृत कार्यक्रम ठरला आहे. शनिवारी जनता कर्फ्युप्रमाणे लॉकडाऊन पाळला जात आहे. तसेच महाराष्ट्राला केंद्राकडुन ११२१ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत ७०० व्हेंटिलेटर्स हे गुजरातकडून तर उरलेले तामिळनाडूमधुन मागवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.