मुंबई : राज्यातल्या करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला आहे. तसेच राज्यात इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन अशा गोष्टींची कमतरता जाणवत आहे. परिणामी रुग्णांचे हाल होत असतानाचे विदारक चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे.
यातच काल नालासोपारा येथे दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण १० करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.
यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित नालासोपारा येथील हे मृत्यू थांबवता आले असते, अशी टीका राज्य सरकारवर ट्विट करत केली आहे.
तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील एक व्हिडिओ ट्विट करत, नालासोपारामधील करोना रुग्णांचा मृत्यू झालेला नसून, ठाकरे सरकारने केलेली हत्या आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा, अशी भूमिका घेतली आहे.
यातच आता भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून, उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?’, असा प्रश्न भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का?, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT आणि आरोग्यमंत्री @rajeshtope11 नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? pic.twitter.com/H5uzYK92S1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 13, 2021
राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसीवीरचा काळाबाजार तर कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मते सर्व आलबेल आहे!, असा घणाघात भाजपने केला आहे.
घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरलं असावं. कोरोनाचं संकट थैमान घालत असताना आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली लुटालुटीचे नवीन धंदे सुरू आहेत. आता या सर्व गोष्टीला राजाचा आशीर्वाद आहे की त्याच्या मंत्र्यांचा हे त्यालाच ठाऊक!, अशी बोचरी टीका देखील भाजपकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, नालासोपाऱ्यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १० रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्याबाबतीत वसई-विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रेसनोट जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.
दुसरीकडे विनायक हॉस्पीटलमधील मृत्यू हे ऑक्सिनजच्या तुटवड्यामुळे झाल्याचे वृत्त पालघर पोलिसांनी फेटाळून लावले आहे. संबंधित रुग्णांचा मृत्यू त्यांचं वय अधिक असल्यानं आणि त्यांना सहव्याधी असल्यानं त्यात करोनाची लागण झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.