मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केलं. त्यानंतर लोणावळ्यात ओबीसींची परिषद भरलीय. त्यातही सर्व पक्षाते ओबीसीचे नेते एकत्र आलेले आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं. ह्या नेत्यांच्या भाषणातखरं मन जिंकलं ते वडेट्टीवारांनी. त्यांनी स्वत:च्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर मनातली खदखद बोलून दाखवली. सोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही साद घातली.
विजय वडेट्टीवार यांना महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल तर महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ होतो. पण तरीसुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात का चिटकले आहात? राजीनामा देऊन तुम्ही खरचं समाजावर प्रेम करता हे दाखवून द्या, असे आव्हानच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी वडेट्टीवार यांना ट्टिट करत केले आहे.
मी ओबीसी मंत्रालयासाठी निधी मागितला. तर सरकार तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत आहेत. आपण सर्व एकत्र नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मी विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे महसूल विभागासारखं महत्त्वाचं खातं मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र मिळालं ओबीसी मंत्रालय,’ असं वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर आता भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल वडेट्टीवारांची तर महाविकास आघाडी ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ होतो पण तरीसुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात का चिटकले आहात??? राजीनामा देऊन तुम्ही खरचं समाजावर प्रेम करता हे दाखवून द्या. https://t.co/PlaHOBnA4a
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 28, 2021
वडेट्टीवारांची खदखद
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांची खदखद बाहेर पडली. राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद तरी मिळेल असं वाटलं होतं. पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खातं मिळालं. पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळालं असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणजेच आपण फक्त ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात असा दावाच वडेट्टीवारांनी केला.
मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहोत. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल, प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब… माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी झुकायला आणि वाकायला तयार आहे समाजासाठी. या बैठकीचा विचार ज्यावेळी पहिल्यांदा मांडला त्यादिवशी पासून मला रोज धमक्या येत आहेत. मला रोज १० धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. कोरोना लाट गेली, की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार. जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे. आमच्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले.