सातारा : मार्च अखेरीस सुरू झालेली कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट आता काहीशी ओसरताना दिसत आहे. राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्य सरकारने संसर्ग साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले होते, आता हे निर्बंध अजून 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे कोरोनारुग्णांची वाढती संख्या, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत आहे. अशातच नादुरुस्त व्हेंटिलेटवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरुन ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ‘संकट काळात देखील मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत’, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पीएम केअरकडून आलेले अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण असे व्हेंटिलेटर दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. अशा काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत, असे ते म्हणाले.
लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशा शब्दात अजित पवारांनी दादगिरी करणाऱ्यांना इशारा दिला.
Read Also :