IMPIMP

पंढरपुरातून पार्थ यांना लढवण्याच्या मुद्यावर पहिल्यांदा बोलले अजित पवार; म्हणाले…

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर पार्थ पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरवून दुसरी संधी देणार आहे, अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस होत असतानाच उपमुख्यमंत्री व पार्थ यांचे वडील अजित पवार यांनी आज याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अशी कोणतीच चर्चा अद्याप झालेली नाही, असे स्पष्ट केले होते.

‘पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे’, असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या निवेदनात केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने ती जागा रिक्त झाली आहे. मात्र विधानसभेच्या या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करूनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी पुढे नमूद केले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निवेदनाने पार्थ यांच्या उमेदवारीच्या चर्चांना तूर्त पूर्णविराम मिळणार आहे. त्याचवेळी पंढरपूर-मंगळवेढा येथून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता मात्र यानिमित्ताने अधिकच ताणली गेली आहे. येथे उमेदवार राष्ट्रवादीचाच असणार हे पक्कं असलं तरी शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांशी चर्चा करूनच राष्ट्रवादीला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे, हेसुद्धा यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.