मुंबई : 2021च्या मार्च महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. याआधी देखील राणेंनी सप्टेंबर अखेरपर्यंत हे सरकार कोसणार असा दावा केला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. राणेंच्या या आणखी एका दाव्यानंतर आता काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? त्यांना त्यांच्याच पक्षात किंमत नाही, तर दुसरे काय देणार. सरकार आले नाही म्हणून त्यांची तडफड सुरू आहे, अशी बोचरी टीका एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. सोबतच, राणे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य?, असा प्रश्न देखील त्यांनी केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
दरम्यान, येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार, असल्याचा पुन्हा एकदा दावा नारायण राणेंनी केला आहे.