कोल्हापूर – कोल्हापुरातील खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं मूळगाव आहे. पण खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने 9 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे. शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातच पराभूत केल्याने पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने भाजपला नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही बोललं जात आहे.
कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाजारी व्यक्त केली होती. मात्र या आघाडीवरही शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे. सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळालं होतं.
दरम्यान, राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे