No Result
View All Result
सांगली: आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सर्वच पक्षांनी जोरदारपणे मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, ‘समोरचा टप्प्यात आला, की करेक्ट कार्यक्रम करायचा’, अशी राजकीय शैली असलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
त्यांच्या राजकीय डावपेचांनी, भाजसह इतरही पक्षाचे गट निहाय संभाव्य उमेदवार आणि गट राष्ट्रवादीत खेचले जात असून, सगळ्याच पक्षात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे, भाजप देखील अध्यक्ष बदल करण्याचे धाडस दाखवायला तयार नसून, जिल्हा परिषदेतील उरलेली सत्ताही या प्रकारामुळे अडचणीत येईल, अशी भिती त्यांना आहे. मात्र यामुळे, भाजपच अडचणीत आली असून, अध्यक्ष बदलाची मागणी करणारा पक्षातला नाराज गटही, जवळजवळ राष्ट्रवादीच्या गळाला लागेल की काय, अशी स्थिती आहे.
दरम्यान, सध्या जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. मात्र त्यांना इथे संपूर्ण बहुमत नाही. त्यांना शिवसेनच्या ५, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १, रयत आघाडीच्या २ अशा इतर घटकांची साथ आहे. सध्याच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी राजीनामा द्यावा आणि नवे पदाधिकारी नेमावेत, अशी मागणी भाजपच्या एका गटाने लावून धरली आहे. त्यासाठी थेट फडणवीसांची भेट घेऊन चर्चा झाली आहे. मात्र इथेच डाव उलटा पडला तर आणि राष्ट्रवादी-काँग्रेसने डाव साधला तर, अशी शंकायुक्त भिती भाजपला आहे.
दुसरीकडे, प्रत्यक्षात पाहता ४ महिन्यांचीच भाजपची सत्ता बाकी आहे. त्यामुळे, भाजपने घाबरू नये आणि नवीन अध्यक्ष नेमावा अशी चर्चा आहे. पण जयंत पाटीलांमुळे भाजपसमोरील आव्हाने अजून खडतर होत चालली असून, जिल्ह्यातील जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशा प्रमुख नेत्यांभोवतीच पाटलांनी फिल्डिंग लावली असल्याने, आता त्यांच्या या डावपेचाला भाजप प्रदेशाध्यक्ष कसे उत्तर देतात आणि त्यासाठी काय व्यूहरचना करतात, याकडे लक्ष असेल.
No Result
View All Result