सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता येताच माळशिरसला पाणी मिळू दिले नाही. राज्यात सत्ता येताच त्यांनी पुन्हा बारामतीकडे पाणी वळविले. तरीही माझ्या काळात कॅनॉल बंद करू दिला नाही,असे विधान भाजपचे खासदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. ते ,माळशिरसमध्ये बोलत होते.
“भाजपत संघटनात्मक बांधणी महत्त्वाची मानली जाते. काम करणाऱ्या व्यक्तींना पक्ष मागे ठेवत नाही. भाजपचा कार्यकर्ता उपेक्षित राहणार नाही. मी खासदार होण्यात माळशिरस तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे रेल्वे, नीरा देवघर, कृष्णा-भीमा स्थिरीकरण या योजनांसाठी कायम आग्रही आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडू. पालखी मार्ग बाधितांसाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे भारतीय जनता पक्षाच्या संघटन बांधणीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीत खासदार नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक रवी अनासपुरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, भाजप ओबीसी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, के. के. पाटील, अतुल सरतापे, काकासाहेब मोटे उपस्थित होते.