मुंबई : वीज बिलाच्या मुद्यावरून राज्यभरात भाजपचे नेते आंदोलन करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘भाजपला वीज बिलाच्या मुद्यावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही’ असं म्हणत फटकारून काढले आहे. तसंच, वीज बिल कनेक्शन तोडले तर वंचित आघाडीकडून ते जोडले जाईल, असंही आंबेडकर म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आपले परखड मत व्यक्त करत महाविकास आघाडी सरकार आणि भाजपवर आसूड ओढला आहे.
‘भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे वीज बिलाच्या संदर्भात वसुली ही अत्यंत कमी होती. त्यामुळे थकबाकी वाढत गेली. मार्च 2020 ला 51 हजार कोटींवर पोहोचली आहे. भाजपच्या काळात वीज थकबाकी आणि वीजदारात प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे वीज बिलाच्या मुद्यावर भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही, याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. भाजपचे जे काही आंदोलन आहे ते मगरची अश्रू आहे’, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
‘केंद्र सरकारकडे जीएसटीचे 28 हजार कोटी बाकी आहेत, ते राज्याला मिळाले असते तर ग्राहकांना वीज बिल माफ झाले असते’ असं परखड मत सुद्धा आंबेडकर यांनी व्यक्त केले. ऊर्जा खात्याने खुलासा केला पाहिजे की, घरगुती स्वरुपातील ग्राहकांना सवलत देता येते ही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे का घेऊन गेली नाही, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
वीज सवलत देण्याची फाईल अर्थखाते असलेल्या अजित पवार यांच्याकडे जाते. अजित पवार हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना विचारत न घेता परस्पर नाकारतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नेमके कोण आहे? उद्धव ठाकरे आहेत की अजित पवार? असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. ‘जी काही सूट मागितली जात आहे, घरगुती वापराच्या संदर्भातील आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये साडे तीन हजार कोटींचा बोजा आला आहे. वीज मिटरमध्ये रिडिंग चूक झाल्याचे महावितरणने स्वत: कबुल केले आहे. त्यामुळे आमच्याकडून काही चुका झाल्या आहे. त्यामुळे वीज बिल हे 50 टक्के कमी करण्यात यावे असा प्रस्ताव दिला होता, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनची परत चर्चा सुरू झाली आहे. पण लॉकडाउनला माझा विरोध आहे, लोकं नियम पाळत असतील तर लॉकडाउन का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितीत केला. त्याचबरोबर वाढीव वीज बिल भरू नका, जर तुमचं वीज कनेक्शन तोडलं तर ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोडून देण्यात येईल, असं आश्वासनही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
Read Also :
‘आम्हाला चंपा, टरबुजा बोललेले कसे चालते?’
बॅनरवरून काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फोटो गायब, महाविकास आघाडीच्या बैठकीत राडा
‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचा हल्लाबोल
राज्यातील सरकारला जनतेच्या जीवाची पर्वा नाही, चंद्रकांत पाटलांची टीका