महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. याबाबात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपले मत मांडले आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णसंख्ये दिवसेदिवेस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढण्याचं मोठं कारण म्हणजे केंद्र सरकारने पहिला लॉकडाऊन लागू करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. पहिला लॉकडाऊन लागू करण्याआधी काही दिवसांची मुदत देणे आवश्यक होते. जेणेकरुन सर्व व्यवस्था उभारण्यास राज्य सरकारला वेळ मिळाला असता. स्थलांतरितांचे हाल झाले नसते आणि कोरोनाचा संसर्ग न घेता लोक आपआपल्या निश्चित स्थळी पोहोचले असते. मात्र नोटबंदीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक देशात लॉकडाऊन जाहीर केला. मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर मुंबई, पुण्यातील किंवा शहरी भागातून लोक पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपआपल्या गावी पोहोचले आणि सोबत कोरोनाही घेऊन गेले, त्यामुळे ग्रामीण भागात आज परिस्थिती बिघडत असल्याचं जंयत पाटील यांनी म्हटलं.