मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कार्यक्रमावरून आता पुन्हा एकदा सरकार तोंडघशी पडल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचं, काल सांगण्यात आलं होतं. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आले.
अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आणि भल्या पहाटे त्यांना यु टूर्न घेऊन गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने वाळवावी लागली . पुण्यात येताच त्यांनी बैठका घेतल्या .
या कार्यक्रमांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, महापौर, स्थानीक आमदार सर्वणकर आणि स्थानिक दोन नगरसेवक, मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव अशा फक्त 16 जणांना आमंत्रण देण्यात आले होते. पण या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अशोक चव्हाण, जयंत पाटील यांच्यासारख्या सत्तेतील प्रमुख नेत्यांना आमंत्रण नव्हते. तर मंत्रिमंडळातील अनेकांना या कार्यक्रमाची कल्पना देखील नव्हती. आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.
कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आखण्यात आला होता. पण राज्यातील प्रमुख नेत्यांनीच या कार्यक्रमाची कल्पना देण्यात आली नव्हती. काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनाही या कार्यक्रमा बाबत सूचना नव्हती. मंत्रिमंडळातील अनेकांनी आपली नाराजी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवली. अखेरीस हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळच सरकारवर आली. यामुळे महाविकास आघाडीत काहीतरी बिघडत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.