नवी मुंबई – मुंबईनंतर आता नवी मुंबई महापालिका निवडणूकही स्वतंत्र म्हणजेच स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा आज काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला.
“अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी दिली जाईल. पक्ष एकट्याचा नसतो तर त्याची विचारधारा मानणाऱ्या सर्वांचा असतो”, अशा कानपिचक्या नवी मुंबईतील काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. (Congress will contest Navi Mumbai municipal Election independently)
नवी मुंबई काँग्रेस ही कायम सत्ताधारी पार्टीबरोबर फरफटत चालते असा नेहमीच आरोप केला जातो. काही वर्षांपूर्वी राजकीय अज्ञातवासात गेलेले अनिल कौशिक (Anil Kaushik) यांना पुन्हा संधी देत काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत आली होती. मात्र सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात असून, काही दिवसापूर्वी अचानक चार प्रवक्त्यांना काढण्यात आले होते.
काँग्रेस भवनच्या नूतनीकरण उद्धाटन कार्यक्रमात या सर्व घटनांचे पडसाद दिसून येत होते. नाना पटोले यांनी आपल्या भाषणात आणि पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांच्या बोलण्यातून नवी मुंबई काँग्रेसबाबत त्यांचा नाराजीचा सुरु दिसून येत होता.