मुंबई : कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी सर्वजण पुढे येऊन काम करत आहे. या सर्वांना आधीच फ्रंट लाइन वर्कर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता पत्रकारांना देखील फ्रंट लाइन वर्कर घोषित करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांना आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत ‘पत्रकारांना फ्रंट लाइन वर्कर घोषित’ करण्याची मागणी केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील पत्रकारांना फ्रंट लाइन वर्कर म्हणून घोषित करावे, असा सल्ला ठाकरे सरकारला दिला आहे.
दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी धारावीमध्ये कलाकारांना रेशन किटचे वाटप केले. यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली. ‘पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं, त्यांना प्रवासांचे पासेस मिळायला हवेत, प्रत्येक व्यक्तींना लस द्यायला हवी’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
पत्रकारांबाबत एवढी असंवेदनशीलता का आहे?, पत्रकाराना फ्रंट लाईनचा दर्जा द्यायला पाहिजे. खूप विभाग आहेत, जिथे संवेदनशील पद्धतीने सरकारने मदत केली नाहीये, आपण त्यांचे लक्ष इथे वेधायला पाहिजे, जर ते ग्राऊंड लेव्हलवर उतरून काम करीत नसतील, तर सरकारमध्ये राहण्याचा काय फायदा आहे, असे त्या म्हणाल्या.
Read Also :