मुंबई : अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टानं तर कंगना रणौत हिच्यावरुन मुंबई हायकोर्टानं ठाकरे सरकारला फटकारलं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ तीन ट्वीट करून सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सोबतच काही सवालही केले आहे. ‘आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का, हा प्रश्न निर्माण होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असंही टोलाही देवेंद्र फडवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत.
आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2020