चंद्रपूर : गेल्या 100 वर्षात पूर्व विदर्भात प्रथमच उद्भवलेली पूरपरिस्थिती ही अचानक निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने पीकहानी, घरे पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे, अशा स्वरुपाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने मानवीय दृष्टीकोनातून युध्दपातळीवर पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांना दिले.
सोबतच, चंद्रपूर जिल्ह्यातील 8-9 हजार पूरग्रस्त प्रति कुटुंबांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
सर्वेक्षणानंतर पुर्ण उध्वस्त झालेल्या घरांसाठी 95 हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी 50 हजार आणि अंशतः पडझड झाली असेल तर 15 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पूरग्रस्त् भागात सध्याच्या काळात महामारी पसरणार नाही यासाठी पिण्याचे शुध्द पाणी, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था, नियमित वीज पुरवठा, रोहित्रे व रस्ते दुरूस्ती याकडे लक्ष वेधण्याचे निर्देश दिले. पडलेल्या घरांच्या संदर्भात अल्प, मध्यम, व पूर्णबाधित या तीन प्रकारात सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामध्ये विशेष बाब म्हणून घरे दुरुस्ती व निर्माणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील.