नंदुरबार: महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. दरम्यान, हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेतील ११ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसलाही स्वबळावर निवडणूक लढावी लागणार आहे. तर तिकडे भाजपने कुठल्याही पक्षासोबत युती स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढत बघायला मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खुल्या प्रवर्गातील जागांसाठी या पोटनिवडणुका होणार आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अद्यापही सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुका रद्द होतील किंवा केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र असं असलं तरी निवडणुका झाल्यास त्या स्वबळावर लढण्याचा नारा नंदुरबार जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी दिला आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पोटनिवडणुकीच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट होण्याआधीच या शिवसे-राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्यामुळे नाईलाजास्तव काँग्रेसलाही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनेना स्वतंत्र निवडणूक लढवून आपली ताकद जिल्ह्यात सिद्ध करेल असा विश्वास पक्षाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जिल्ह्यात आपले जगेल वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी दिसून येत असली तरी भाजप मात्र निवडणुकांसाठी तयार असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्यामुळे मतविभाजनाचा फटका त्यांनाच बसण्याची दाट शक्यता आहे.