मुंबई : राज्यात महामारीच्या दिवसेंदिवस होणाऱ्या रुग्णवाढीमुळे बेड्स, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि लसींची उपलब्धता अपुरी आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातले राजकारण शिगेला पोहोचले आहे.
याच दरम्यान, आज ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना बोलत असताना, महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सोयी-सुविधांच्या पुरवठ्याविषयीची महत्त्वाची माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, ‘राज्यात इंजेक्शनचा तुटवडा आहे. आदर पुनावाला म्हणाले राज्याची क्षमता भागेल, एवढी लस आम्ही देऊ शकत नाही, आमची क्षमता आहे तेवढी देऊ. त्यामुळे रेमडीसीवर इंजेक्शन मग ती लस कोणत्याही कंपनीची असो, त्या सर्वांचा उल्लेख जे बल्क टेंडर निघेल त्यात असेल. तसेच, १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. याबाबत १ मे च्या दिवशी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत राज्याची भूमिका सांगतील, असं पवार यांनी सांगितलं.
तसच, “देशाप्रमाणेच महाराष्ट्रात देखील ऑक्सिजनचा तुटवडा आहे. इतके दिवस राज्याची जी गरज होती, ती भरुन काढण्यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. याचा परिणाम म्हणून ऑक्सिजन एक्सप्रेस आणि विमानातून ऑक्सिजन टँकर नेण्याची परवानगी राज्याला मिळाली आहे, असे सांगितले.
यावेळी लसीकरणाची जबाबदारी राज्याने उचलावी, असं केंद्राला वाटतंय, त्यामुळे पुढच्या गोष्टींचा विचार करून, आम्ही ५ जणांची कमिटी बनवत आहोत आणि त्यासाठी ग्लोबल टेंडर काढत असून, ग्लोबल टेंडर काढण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.