अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या स्वतःच्या कागल मतदारसंघामध्ये लॉकडाउन केला आहे. परंतु अहमदनगरमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत असूनही त्यांना अहमदनगरकडे लक्ष्य देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने मनसेने एक आगळेवेगळे आंदोलन सुरु केल्याचे दिसून आले आहे.
जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, त्यांना तातडीने शोधून द्या. अशी मागणी करणारे पत्र मनसेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
अमरधाममध्ये मृत्यू झालेल्यांना जाळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बैठकांव्यतिरिक्त जिल्हयात फिरकत नसल्याने ते हरवले आहेत का ? अशी शंका पुरोहित यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
अहमदनगर शहर व जिल्ह्यात १० ते १२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र, मुश्रीफ यांना सर्व नियंत्रणात असल्याचे वाटते, असे पुरोहित यांनी या पत्रात नमूद केले आहे.
मुश्रीफ फक्त बैठकांसाठीच नगरला येतात. त्यांनी सिव्हील हॉस्पिटल तसेच अमरधामला अजूनही भेट दिलेली नाही. कोरोनाच्या या संकटकाळात पालकमंत्री मुश्रीफ हरवले असल्याने त्यांना तातडीने शोधून द्यावे, अशी मागणी पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून, मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे.