मुंबई : अनिल देशमुख यांनी काल राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर, आज गृहमंत्री पदाची सूत्रे दिलीप वळसे पाटील यांनी हातात घेतली. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची, त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “गृहमंत्रिपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच मी त्या पदाची सूत्रं हाती घेणार आहे. ही सूत्रं हाती घेण्यापूर्वी मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं मार्गदर्शनही घेतलं,” असे उद्गार काढले.
तसेच, आज नवनिर्वाचित गृहमंत्र्यांनी, पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,’ अशी ग्वाही दिली.
यासोबतच त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे. “कुणाची निकाय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप-वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, काल मुंबई हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना, आरोपांची प्राथमिक चौष्ठा कशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, सीबीआयला या मुदतीमध्येच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
या अनुषंगाने गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, ‘मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी, कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एनआयए असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही सांगितलं.