मुंबई : ज्यात महामारीच्या लाटेने कहर केला आहे. या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे, तरीही दिवसेंदिवस महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. तर दुसरीकडे मृत्यूदर देखील उंचावत आहे. यातच राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून रेमेडीसीवर इंजेक्शन्स, बेड्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी, सरकारमधील मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत विधान केले होते. तसेच राज्यातली परिस्थती आटोक्यात येत असली तरी, ती अजूनही नियंत्रणात नाही. यामुळे राज्यात १ मे नंतर देखील आणखीन १५ दिवस लॉकडाऊन नक्कीच वाढवला जाऊ शकतो, असे प्रसारमाध्यांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितले होते.
यानंतर आज राज्य सरकारने राज्यातला लॉकडाऊन हा १५ मे पर्यंत वाढवला असून, त्याबाबतचे नवे आदेश देखील जारी केले आहेत. त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
Maharashtra government extends current COVID19 restrictions till May 15 pic.twitter.com/TaE6hCJoIV
— ANI (@ANI) April 29, 2021
राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहाता लॉकडाउनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती.