औरंगाबाद : कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये. शहराचा स्तर (Level) एक अबाधित रहावा. ग्रामीणचा स्तर (Level) तीनवरून एक करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. निर्बंधातील शिथिलतेमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरटीपीसीआर चाचणी, लसीकरण अधिक करण्यावर प्रशासनाचा भर असेल. नागरिकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत केले.
मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे, फेसशिल्डचा वापर करणे आदी नियमांचे कसोशीने पालन करावे. शहरातील पॉझिटिव्हीटी रेट कमी जरी होत असला तरी मनपाने जनजागृतीवर भर द्यावा. डिजिटल फलकांव्दारे प्रचार-प्रसार करावा. विविध प्रचार साहित्यांचा अवलंब करावा. तर ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी वेळेसह इतर नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा. उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या निर्बंधाचे पालन होण्यासाठी सातत्याने जनजागृतीवर लक्ष केंद्रित करावे. हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी 50 टक्के क्षमतेने परवानगी दिली आहे. त्याकरिता हॉटेल चालक, मालकांनी दर्शनी भागात आसन क्षमता, कर्मचारी, त्यांचे लसीकरण याबाबत सविस्तर अद्यावत माहिती लावावी, अशा सूचनाही श्री. चव्हाण यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची कोविड -19 तपासणी करणे बंधनकारक आहे. आजपासून सात दिवसानंतर सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्यासह कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करावी. कोविड-19 टेस्टिंग कीट जिल्ह्यात मुबलक प्रमाणात आहेत. तर शहरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे दररोज जवळपास साडे तीन हजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील प्रयोगशाळेत जवळपास अडीच हजार आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनाच्या मोबाईल व्हॅनद्वारे साधारणत: अडीच ते तीन हजार अशा जवळपास साडे आठ हजार चाचण्यांची जिल्ह्यातील क्षमता आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणावरही अधिक लक्ष केंद्रित करावे. ज्यांना शक्य आहे अशा नागरिकांनी खासगी इस्पितळातून लशींचा डोस घ्यावा. सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी प्रशासनामार्फत दर गुरुवारी जिल्ह्याचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्यात येतील. त्यामुळे नागरिकांची कोविड-19 चा संसर्ग वाढू नये. जिल्ह्यातील स्तरात सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने मस्कचा वापर, वारंवार हात धुणे, आरटीपीसीआर चाचणी, पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन खाटा, ऑक्सिजन निर्मिती क्षमता, लसीकरण, आदी बाबींवरही श्री. चव्हाण यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
Read Also :
- महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
- १६ जुनला पहिला मराठा मोर्चा काढणार; संभाजीराजेंची रायगडावरून घोषणा
- ज्यांना काम नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटणार
- मी बोलल्यानंतरच एवढा गोंधळ कशाला; वडेट्टीवार यांनी केली नाराजी व्यक्त