पूरस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी सिंचन योजनेला देण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली
‘उद्यापासून जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ योजना सुरू करून तलाव भरण्यात येणार असल्याचे पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला द्यावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. यंदा पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही यानिमित्ताने दुष्काळी भागाला पुराचे वाहून जाणारे पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण करत आहोत, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.तसेच सांगलीत आज संध्याकाळपर्यंत 35 फुटापर्यंत पाणी वाढण्याची शक्यता असून पाणी पातळी 35-36 फुटापर्यंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. यासाठी कोयना, चांदोली धरणातील विसर्ग आणि अलमट्टी धरणातील विसर्ग यात ताळमेळ ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातल्या अलमट्टी धरण प्रशासनासोबत आम्ही संपर्क ठेवून आहोत. दुसऱ्या बाजूला राज्यातील धरणातील पाण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.