मुंबई : राज्यात महामारीच्या लाटेने कहर केला आहे. या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे, तरीही दिवसेंदिवस महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. तर दुसरीकडे मृत्यूदर देखील उंचावत आहे. यातच राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून रेमेडीसीवर इंजेक्शन्स, बेड्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहे.
दरम्यान, काल सत्ताधारी पक्षातील मंत्री जयंत पाटील तसेच, विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यातल्या लॉकडाऊनबाबत विधान केले होते. यातच आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यातल्या लॉकडाऊन बाबत खात्रीशीर विधान केले आहे.
आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यांशी बोलताना टोपे यांनी, राज्यातली परिस्थती आटोक्यात येत असली तरी ती अजूनही नियंत्रणात नाही. यामुळे राज्यात १ मे नंतर देखील आणखीन १५ दिवस लॉकडाऊन नक्कीच वाढवला जाऊ शकतो, असे सांगितले आहे.
तसेच, याबाबतचा निर्णय आणि अधिक माहिती मुख्यमंत्री जाहीर करतील, परंतु आजच्या बैठकीत आम्ही सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी हा विचार मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
राज्यात १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर, सातत्याने यामध्ये आणखीन निर्बंधांची वाढ करून, २२ एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावरही बंदी घालण्यात आली. तसेच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. आता १ मेपर्यंत ही नवीन नियमावली लागू राहणार आहे.