मुंबई: शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर मी आजही ठाम असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. वीज मोफत देण्याबाबतचे विधान राऊतांनी केले होते. पण त्यानंतर वाढीव बील सर्वांना भरावे लागेल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते.
यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. यासाठी मी अभ्यासगट नेमला होता मात्र त्याच्या बैठका कोरोनामुळे झाल्या नाहीत. त्याचा अहवाल त्यामुळे माझ्याकडे आला नाही आणि ५९ हजार कोटीची थकबाकीची कल्पना मला नव्हती असे नितीन राऊत म्हणाले. या भाजपच्या पापातून मुक्त होऊन शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय निश्चित घेतला जाईल. अभ्यासगटाला अहवाल लवकर देण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
कृषी वीज धोरण काल मंजूर केले. ५५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे त्यांना या धोरणाचा फायदा होईल. शेतकर्यांना पर्याप्त वीज मिळत नव्हती.हे धोरण ऐतिहासिक असल्याचे राऊत म्हणाले.
यासाठी वार्षिक ६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. वाढीव वीज बिलं भाजपच्या नेत्यांनी माझ्याकडे मंत्रालयात घेऊन यावी. ती बिल योग्य असली तर ती त्यांनी भरावी असेही ते म्हणाले.