मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी खोचक टीका करताना, एकतर अजित पवारांनी राजधानी पुण्यात हलवून इथून राज्य करावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री तरी द्या, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
“अजित पवारांवर राज्याची जबाबदारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या महामारीच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम ते करत आहेत. पुण्यावरही त्यांचं तेवढचं लक्ष आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर अजित पवार उपलब्ध असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांनी पुण्यात येऊन अनेकदा बैठका देखील घेतल्या आहेत. त्याचसोबत पिंपरीत जाऊन पाहणीही केली आहे. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात,” अशी टीका जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
तसेच, चंद्रकांत पाटील कोल्हापुरचे असून पुण्यात येऊन उभे राहिले. त्यामुळे पुण्यातल्या लोकांना आपण काहीतरी करत असल्याचं सांगण्याचा ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यासाठी अजित पवारांवर टीका करत असतील, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असा टोलाही पाटलांनी पाटलांना लगावला आहे.