बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने पीडित महिलेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील सुपा येथे दोन दिवसांपुर्वी समोर आली होती. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आले आहे. आता आमदार नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, अहमदनगर जिल्ह्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. मार्च 2020 मधील बलात्काराची केस मागे घेण्यासाठी महिलेला धमकावण्यात आले. तसेच पीडित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. बलात्काराची केस मागे घे असं म्हणत 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला. यात ती मुलगी 15 टक्के भाजली आहे.
#शिवसेना नगर जि. सुपा येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींनी पिडीतेवर हल्ला प्रकरणी आरोपींना जामीन वा पँरॉलवर सोडताना न्यायालयाकडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी व कठोर कारवाई पोलिसांकडून होणे गरजेचे
आ.डॉ.नीलम गोऱ्हे@AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra @ShivSena pic.twitter.com/Mi2feF2hN1— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) August 16, 2020
बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या आणि इतर घटनांमध्ये अटकेत असलेल्या आरोपींना कोव्हिड-19 मुळे जामीन मिळत आहे. जामीन मिळाला असला तरी देखील त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. सोबतच काही प्रमुख मागण्या देखील केल्या आहेत.
पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. या घटनेतील आरोपींना कोव्हिड-19 मुळे जामीन देण्यात आला. यामुळे पीडितेच्या जीवास धोका निर्माण झाला असल्याने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी. बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना न्यायालयाच्या निर्बंधांचे पालन व्हावे. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.