नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरुन राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालंय. अशावेळी खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. दरम्यान, पंकजा मुंडे नाराज नाहीत, कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नये, असं आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
हे पण वाचा: “हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्यास सांगितलं आहे. भाषणात जरी त्यांनी कौरव, पांडव, धर्मयुद्ध असे काही शब्द वापरले असले किंवा दृष्टांत दिले असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना काय संदेश दिला, काय निर्देश दिले हेच राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे. भाषणाचा मतितार्थ काढायचा असतो आणि पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा मतितार्थ म्हणजे कार्यकर्त्यांनी राजीनामे परत घ्यावे आणि कामाला लागावे.
हे पण वाचा: ‘जरंडेश्वर’प्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार, अजित पवार असणार टार्गेट?
पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत असा विश्वास आहे. पंकजा मुंडे यांच्याशी आपलं नेहमीच बोलणं होत असतं. ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही नुकतंच भेटलो होतो. मी दाव्याने सांगू शकतो की त्या नाराज नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नयेत, अशी विनंती बावनकुळे यांनी केलीय.
कार्यकर्त्यांना भावनिक साद
या पार्श्वभूमीवर, आज त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊन, त्यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी एकदम भावूक होत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. “माझ्या डोळ्यातील पाणी बघून तुम्ही असे वागला असाल, तर तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कशी वागू? सांगा! मी हरले, मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
हे पण वाचा: झोटिंग समिती फास होता, खडसेंना केवळ त्रास होता, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते
“हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, “पंकजा मुंडेंसारख्या नेत्यावर भाजपत अन्याय होत आहे, हे खरं आहे. त्यामुळे, भाजप नेतृत्वाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं मत थोरात यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही दुजोरा दिला असून, पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय, हे खरंच आहे. त्या मराठावाड्यातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या वडिलांनी संपूर्ण राज्यात भाजपला वाढवलं त्यामुळे भाजप नेतृत्वाने त्यांची दखल घ्यायला हवी होती, पण असो हा त्यांचा अंतर्गत विषय आहे,” असं वक्तव्य केलं आहे.