मुंबई : भाजप सत्तेत येऊन 7 वर्ष झाली आहेत, तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यभर मोदी सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
मोदी सरकार अहंकारी आणि आडमुठ्या धोरणांचं असल्याची जोरदार टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातील नोटबंदीपासून, पुलवामा हल्ला, कलम 370, सीएए, राष्ट्रवाद, चीनचा सीमावाद ते सद्यपरिस्थितीतील कोविडच्या कामकाजावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद आणि समता व बंधुत्वाऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष या मुद्द्यांवर निवडणूक लढवून भाजपने बहुमत मिळवल्याचे म्हणत त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
सत्तेतील मित्रपक्षाला विश्वासात न घेणे हे एक आणखी मोदींच्या अहंकाराचे आणखी एक वैशिष्ट्य. केंद्रातील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मोदींना मित्रपक्षांची फारशी गरज उरली नाही. त्यामुळेच की काय भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अकाली दलाने भाजपसोबत काडीमोड घेतल्याचेही चव्हाण यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून देखील त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
Read Also :