कोल्हापूर : मागील 3 वर्षात रायगड संवर्धनाचे काम केवळ 5 टक्के पूर्ण झाले असून, पुढील 8 वर्षात सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये दीड कोटींची अद्ययावत ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, पुरातत्व विभागाकडून काही परवानग्या मिळायला उशीर होत असल्याने सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे.
रायगडचे संवर्धन सुरू आहे त्याच प्रमाणे कोल्हापुरातील अन्य ऐतिहासिक वास्तू जतन होण्याचा आपला उद्देश आहे. रायगड विकासाच्या कामात भाजप सरकार प्रमाणेच महाविकास आघाडी सरकारचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे शनिवारी लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे.