मुंबई : देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवर बोलणे हे आता पाप ठरत आहे. आपले पंतप्रधान मोदी सर्वच विषयांवर त्यांचे मन मोकळे करीत असतात, पण कोसळलेली अर्थव्यवस्था व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना ते स्पर्श करायला तयार नाहीत. नोटाबंदी ते लॉक डाऊन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था साफ मरून पडली आहे, अशी जोरदार टीका शिवसेने नेते संजय राऊत यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था बिकट स्थितीमध्ये आहे, यावरून संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटले की, देशाची कोसळलेली अर्थव्यवस्था म्हणजे देवाची करणी अशी एक पुडी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोडली. सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचे हे कसले हिंदुत्व? देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा?, असं सांगतानाच देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?
कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. कोरोना देवीची स्थापना करणाऱ्य़ा ताराबाई पवारांवर बार्शीच्या तहसीलदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. हा बडगा जनतेवर उगारला. पण कोरोना म्हणजे देवाचा प्रकोप असे जाहीरपणे सांगणाऱ्य़ा निर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही? ‘कोरोना’ काळात लोकांच्या नोकऱ्य़ा गेल्या. पगार थकले. व्यवसाय-उद्योग बंद पडले. लोकांनी आपली घरे, संसार कसे चालवायचे? याची तजवीज देवांनी नाही तर सरकारमध्ये बसलेल्या माणसांनी करायची असते. जगातील अनेक देशांतील सरकारांनी आपापल्या जनतेची ही व्यवस्था केली आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
आधी कोरोना व नंतर आर्थिक घसरण हे संकट आहेच. पण कोरोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार? हिंदुस्थानात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’चा आकडा 23.9 टक्के एवढा कोसळला. ही पडझड मानवी चुकांची व बेफिकीर वृत्तीची करणी आहे. अर्थव्यवस्थेचे मातेरे केले. त्याचे खापर देवावर फोडणे हा मानसिक गोंधळ आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, बँकांची कर्जे बुडवणाऱ्य़ा भांडवलदारांनी देश बुडवला. जे गेल्या 70 वर्षांत झाले ते मागच्या सहा वर्षांतही बदलले नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई?, असा सवाल देखील त्यांनी विचारला.