अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून रिपब्लिक टिव्ही न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहे. आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र सोपवले आहे.
माननीय नामदार श्री. @AnilDeshmukhNCP जी, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन @republic इंग्रजी आणि @Republic_Bharat या हिंदी वाहिनीचे मुख्य संपादक श्री. अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/WsHT5a1fcq
— Arvind Sawant (@AGSawant) August 18, 2020
अरविंद सावंत यांनी पत्रात म्हटले की, बातमीदारीच्या नावाखाली बेजबाबदार बातम्या प्रसारित करणारे व महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट आरोप करणारे ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीनं कारवाई करा. एका मृत महिलेवरही त्यांनी आरोप केले आहेत. तिचे चारित्र्यहनन केले आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने पत्रकारिता व बातम्यांसंदर्भात घालून दिलेल्या मर्यादांचेही ते उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या स्वार्थासाठी बेजबाबदार बातम्या प्रसारित करून गोस्वामी हे समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यामुळं राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
अरविंद सावंत हे गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी करत म्हणाले की, गोस्वामी यांच्या चॅनेलवरून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप केले जातात. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेलाही त्यांनी धक्का पोहोचवला आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना धमकावण्यापर्यंत अर्णब गोस्वामी यांची मजल गेली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.