मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा १ मार्च पासून सुरु झाला असून, यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस टोचवून घेण्याचे आवाहन राज्यातील नेत्यांनी आणि सर्वच प्रसिद्ध व्यक्तीनी पुढाकार घेऊन केले होते. मात्र राज्यातील ४५ वर्षांखालील नागरिकांना लस टोचवून घेण्याची परवानगी दिली गेली नव्हती.
दरम्यान, देशातील वाढती करोना बाधित रुग्णांची संख्या पाहता, काल केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस टोचवून घेण्याची परवानगी दिली. मात्र असे असताना देवेंद्र फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? असा सवाल काँग्रेसने उपस्थित करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
तसेच भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचासुद्धा गुप्त साठा आहे का? अशा एक ना अनेक प्रश्नांची जंत्रीच काँग्रेसने सादर केली आहे.
दरम्यान, यानंतर आता नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या (एनसीआय) प्रशासनाकडूनही सावध पवित्रा घेण्यात आला आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना तन्मय फडणवीसनं आपल्याकडे केवळ दुसरा डोस घेतल्याचं म्हटलं आहे.
“तन्मय फडणवीस यानं मुंबईतील सेव्हन हिल्स या रुग्णलायात पहिला डोस घेतला. त्यानं कोणत्या निकषांनुसार तो घेतला याची कल्पना नाही. त्यानं आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यावर आमच्या सेंटरमध्ये त्याला दुसरा डोस देण्यात आला,” असं जोगळेकर यांनी नमूद केलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने करोनाची लस घेतल्याचा फोटो समाज माध्यमांवर पसरल्यानांतर, देवेंद्र फडणवीसांवर चारही बाजूंनी टीका केली जात आहे. दुसरीकडे त्यांचा हा फोटो सगळीकडे पसरल्यानंतर तन्मय यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो तात्काळ डिलीट देखील करण्यात आला आहे.
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021