मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच, उद्योग निरीक्षक संवर्गाची पदभरती बाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे.
कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य
कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेत 1 मार्च 2020 रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्यू पावलेले, किंवा एका पालकाचा कोविड-19 मुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (1 मार्च 2020) पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी शून्य ते 18 वयोगटातील बालकांचा या योजनेत समावेश होणार आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजना
स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 10 वसतिगृह सुरु करण्यात येतील. नवीन वसतिगृहे बांधण्यास कालावधी लागणार असल्याने सुरुवातीला ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येतील.एकंदर बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव अशा 10 जिल्ह्यांमधील 41 तालुक्यांच्या ठिकाणी ही वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत.
उद्योग निरीक्षक संवर्गाची पदभरती
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क,अराजपत्रित) या पदाची निवड यापुढे जिल्हा निवड समितीकडून न करता, ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
Read Also :
- बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधेवरून मनसे आक्रमक
- ‘मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही’
- लसीसाठी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? किशोरी पेडणेकर म्हणतात… ‘तुझ्या बापाला’
- ‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला’
- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेत्याचा मृत्यू