मुंबई : राज्यातल्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीला उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल हे उद्योगपती व इतर काही उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी, करोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, त्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासोबतच उद्योगांनी औषधे, विलगीकरण, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे, अशी या लढाईत शक्य होईल तितकी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन उद्योगांना केले. यावर उद्योगांच्या प्रतिनिधींनीकडून, पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु होईल असे आश्वासन देण्यात आले.
तसेच मुख्यमंत्र्यांनी, कोविडसंदर्भातील सुविधा उभारणे किंवा त्या संदर्भातल्या आवश्यक त्या बाबींमध्ये, राज्य शासन तातडीने मदत करेल. ऑक्सिजनची राज्याला खूप गरज असून, सध्या सर्व प्रकारचा ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरला जात आहे. येत्या काळात रुग्णांची वाढती संख्या पाहता, आणखी ऑक्सिजनची गरज भासत असून, आपण पंतप्रधानांना देखील तसे कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या सूचना मांडल्या, तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे सांगितले. यावेळी राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे, तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
तसेच त्यांनी राज्यातील उद्योगांना, करोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील खीळ बसू नये म्हणून, उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात आणि कार्यप्रणाली अवलंबवावी, असे आवाहन केले आहे.