IMPIMP
raut raut

एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे : शिवसेना

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर ते काल हाथरस गेले होते. तिचे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान काल प्रियांका गांधींवर पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे देशातील अनेक नेते सरकारवर टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे.

हाथरस अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोख या सदरातून योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे, भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे, असा आरोप त्यांनी सामनात लिहिलेल्या लेखात केला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं आहे की, ‘बेटी बचाव’ वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कुणी प्रखर आंदोलन चालवले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की, कंगना रनौतने जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्यं केलं तेव्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले होते की यापुढे तिने अशी वक्तव्यं केली तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कंगनाचे थोबाड फोडतील. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर आणला होता. तोच महिला आयोग आज हाथरस प्रकरणात शांत बसला आहे. हाथरसच्या बालात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचू शकला नाही हा प्रकारच धक्कादायक आहे, असं त्यांनी म्हटलंय.

29 सप्टेंबरला हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला तेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरु झाले होते. दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असलेल्या हाथरसमध्ये पोलिसांनी चुपचाप पीडित मुलीची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. अँब्युलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच मुलीच्या आईने स्वतःला अँब्युलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय आणि अमानुषता कशासाठी? हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना फक्त अडवले नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी रामजन्मभूमिची पूजा केली. त्यावेळी श्रीरामासोबत सीतामाईचा वावर तिथे होता. त्याच भूमिवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सगळे त्याच उत्तर प्रदेशात घडले जिथे भाजपाचे सरकार आहे. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडली असती तर सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली असती. उत्तरप्रदेशबाबत अशी मागणी होताना दिसत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Read Also ;