नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून नवीन कृषी कायद्यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. चर्चेनंतर देखील तोडगा निघत नसल्याने हे आंदोलन चिघळले जाण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने या ‘आंदोलनात आलेले शेतकरीच नसल्याचे, तसेच, यामागे पाकिस्तान-चीनचा हात’ असल्याचे दावे केले जात आहेत. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ‘देशविरोधी शक्तींकडून शेतकरी आंदोलन हायजॅक’ केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना निर्मला सीतारमन म्हणाल्या की, राजकीय फायद्यासाठी वापर होण्यापासून शेतकऱ्यांनी स्वतःला वाचवावे. राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला जात असल्याचा, आरोप देखील त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आंदोलन विरोधी पक्षाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक करण्यात आले असल्याचे सीतारमन म्हणाल्या.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि पीयुष गोयल शेतकऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहेत. पुढील चर्चेसाठी सरकार नेहमीच तयार आहे. पण आता या आंदोलनात कृषीसंबंधी मुद्दे मागे पडत असल्याची भीती आहे. शेती आणि शेतकऱ्यांसंबंधी मुद्दे आता आंदोलनात मांडले जात नाही आहे. देशविरोधी घटकांना हवा दिली जाते आहे. शेतकरी आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.